लग्नविधी पार पडल्यानंतर नववधू नवरदेवासोबत सासरी जाण्यास निघाली, तिने कारमध्ये पाय ठेवताच नवरदेवाला चक्कर आली आणि तो तिथेच बेशुद्ध पडला. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला.
दु:खद घटनेने लग्नमंडपात शोककळा पसरली, नववधूचे सुखी संसाराचे स्वप्न अवघ्या काही मिनिटांत भंगले. ही दुर्देवी घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार आंग पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातील मुलीचे रविवारी लग्न होते. लग्नाचे वऱ्हाड कानपूरच्या नौबस्ता येथून आली होते. श्यामसुंदरचा मुलगा मोनू गौतम, वर रविवारी संध्याकाळी थाटामाटात लग्नाच्या मिरवणुकीसह गावात पोहोचला. लग्नाच्या विधी सुरू झाल्या. थाटामाटात लग्न पार पडले. सोमवारी सकाळी पाठवणीची तयारी सुरू होती. सगळं काही सामान्य होतं.
नवरी आली आणि गाडीत बसली. या दरम्यान अचानक नवरदेव मोनू बेशुद्ध पडला. लोक त्याला उचलण्यासाठी धावले. त्याला आंग शहरातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्याला कानपूरला रेफर करण्यात आले. पण त्याचा वाटेतच मृत्यू झाला. मुलीच्या भावाने सांगितले की, मोनू अचानक बेशुद्ध पडला आणि नंतर रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.