Wednesday, August 6, 2025
Homeकोल्हापूरसरकारच्या याचिकेनंतर वनताराचाही मोठा निर्णय; महादेवी हत्तीणचं काय होणार?

सरकारच्या याचिकेनंतर वनताराचाही मोठा निर्णय; महादेवी हत्तीणचं काय होणार?

महादेवी हत्तीणीला (माधुरी) कोल्हापुरात परत आणावे अशी मागणी केली जात आहे. अगोदर या संदर्भातील आंदोलन कोल्हापुरात सुरू झाले. याच अंदोलनाची दखल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातून महादेवीला परत आणावे, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, जनभावना लक्षात घेता आता राज्य सरकारने या प्रकणात लक्ष घातलं आहे. महादेवी हत्तीणीला नांदणी मठाकडे परत आणण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करेल, असं सरकारने जाहीर केलंय. राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर आता वनताराने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

 

कोल्हापूरकरांच्या आशा झाल्या पल्लवीत

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर हत्ती तसेच इतर प्राण्यांची काळजी घेणाऱ्या वनतारा ही संस्था महादेवी हत्तीणीला घेऊन गेली होती. त्यानंतर कोल्हापुरात संताप व्यक्त करण्यात आला होता. आता राज्य सरकारने या प्रकरणी याचिका करणार असल्याचे समजल्यानंतर वनताराने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमची भूमिका ही फक्त न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यापुरतीच मर्यादित आहे. आम्ही सराज्य सरकारच्या याचिकेला पाठिंबा देऊ, असे वनताराने म्हटले आहे. त्यामुळे आता महादेवी हत्तीण पुन्हा एकदा कोल्हापुरात परतण्याची आशा पल्लवीत झाली आहे.

 

वनताराने नेमकं काय म्हटलं आहे?

माधुरीच्या देखभाल आणि शुश्रुषेबाबत वनताराने एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. नांदणी गावातील जैन संस्थान मठ आणि कोल्हापूरच्या लोकांमध्ये माधुरीचे आत्यंतिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे, याची पूर्ण जाणीव वनतारास आहे. गेल्या अनेक दशकांपासून ती आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा भाग राहिली आहे. माधुरी कोल्हापुरातच रहावी अशी इच्छा आणि आपुलकी व्यक्त करणाऱ्या भक्त, मठाचे नेते आणि लोकांच्या भावनांची पूर्ण जाणीव आणि आदर आम्ही करतो, असे वनताराने म्हटले आहे.

 

माधुरीच्या स्थलांतराची शिफारस केलेली नाही

तसेच, यातील वनताराचा सहभाग मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या बंधनकारक निर्देशांनुसार काटेकोर काम करण्यापुरता मर्यादित आहे. माधुरीला हलविण्याचा निर्णय न्यायालयाने त्यांच्या अधिकारात घेतला होता. स्वतंत्रपणे चालवलेले एक बचाव आणि पुनर्वसन केंद्र म्हणून त्यात वनताराची भूमिका केवळ माधुरीची देखभाल करणे, तिला पशुवैद्यकीय सहाय्य पुरविणे आणि तिच्या निवासाची व्यवस्था करणे अशी होती. वनताराने कोणत्याही टप्प्यावर माधुरीच्या स्थलांतर करण्याची शिफारस केली नाही किंवा तिचे स्थलांतर सुरू केले नाही. धार्मिक प्रथा किंवा भावनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असेही वनताराने स्पष्ट केले आहे.

 

कायदेशीर अर्जास वनतारा पूर्ण पाठिंबा देईल

कायदेशीर वर्तन, प्राण्यांची जबाबदारीने काळजी घेणे आणि सामुदायिक सहकार्य यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यानुसार माधुरीला कोल्हापूरला परत आणण्यासाठी मठ आणि महाराष्ट्र सरकार यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर केलेल्या कायदेशीर अर्जास वनतारा पूर्ण पाठींबा देईल. न्यायालयाच्या मान्यतेनुसार वनतारा तिच्या सुरक्षित आणि सन्मान्य परतीसाठी संपूर्ण तांत्रिक आणि पशुवैद्यकीय सहाय्य प्रदान करेल, असेही वनताराने म्हटले आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -