‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ या म्हणीप्रमाणेच लातूरच्या रामलिंग मुदगड येथे धक्कादायक घटना घडली आहे. शेतीच्या वादातून लहान भावानेच मोठ्या भावाची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव गुलाब विलास खरोसे असे आहे, तर आरोपीचे नाव उल्हास खरोसे असे आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुलाब खरोसे आणि उल्हास खरोसे हे दोघेही सख्खे भाऊ होते. दोन्ही भावांमध्ये वडील पारित असलेल्या ८ एकर शेतीच्या वाटणीवरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. रात्री मोठा भाऊ मृत गुलाब खरोसे (वय ३४ ) हा शेताकडे निघाला. आरोपी उल्हास खरोसे हा आधीपासून रस्त्यात डब्बा धरून बसला होता.
गुलाब खरोसे येताच उल्हासने त्याच्यावर हल्ला केला. त्याचा दोरीने गळा आवळून डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. मृतदेह बाजूलाच असलेल्या नाल्यात फेकून देत,आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच कासार-शिरशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनेचा पंचनामा केला.आरोपीला 48 तासाच्या आत पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.






