सर्वाधिक जागा जिंकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर दावा सांगितला जात असतानाच भाजपमधील काही इच्छुकांकडून या पदासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे.
त्यामुळे भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांच्यासह घटक पक्षातील नेते कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपमध्ये राजकीय रस्सीखेच सुरू झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदावर ठाम दावा केला जात असताना भाजपमधील काही इच्छुकांनीही या पदासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याने महायुतीतील समीकरणे चांगलीच तापली आहेत. परिणामी, अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांची भूमिका काय असेल, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सर्वाधिक सदस्यांसह सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्यामुळे महायुतीत ‘जास्त जागा त्या पक्षाला अध्यक्षपद’ हा नियम लागू करावा, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली आहे.
दुसरीकडे भाजपमधील काही इच्छुकांनीही अध्यक्षपदाच्या शर्यतीत उडी घेतली आहे. जिल्ह्यातील भाजपच्या वाढत्या राजकीय ताकदीचा दाखला देत अध्यक्षपदावर भाजपचा हक्क असल्याचा दावा काही नेते करत आहेत. त्यामुळे महायुतीतील समन्वय राखत अध्यक्षपदाचा निर्णय कसा घेतला जाणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महायुतीच्या सूत्रांनुसार अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा फॉर्म्युला ठरवताना घटक पक्षांमधील ताकद, जिल्ह्यातील राजकीय संतुलन या बाबींचा विचार केला जाणार आहे.
अध्यक्षपदाच्या दाव्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे. दोन्ही पक्षातील इच्छुकांकडून मुंबईत वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधत लॉबिंग सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. महायुतीतील अंतिम निर्णय मात्र मुंबईत होणाऱ्या वरिष्ठ नेत्यांकडून घेतला जाणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड केवळ स्थानिक सत्तासमीकरणापुरती मर्यादित न राहता महायुतीतील राजकीय समन्वयाचीही कसोटी ठरणार आहे.





