मिचेल मार्श याने केलेलं शतक आणि दिग्वेश राठी याने शेवटच्या ओव्हरमधील केलल्या चिवट बॉलिंगच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने अखेर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात पराभवाची मालिका खंडीत केली आहे. लखनौसमोर होम ग्राउंड एकाना स्टेडियममध्ये मोसमातील 50 व्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान होतं. लखनौला या मोसमातील प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत आरसीबी विरुद्ध जिंकायचंच होतं. त्यामुळे लखनौच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष होतं. मात्र सातत्याने अपयशी ठरणाऱ्या लखनौने गतविजेत्या संघाला पराभवाची धुळ चारून 2 गुणांची कमाई केली. लखनौने आरसीबीवर डीएलएसनुसार 9 धावांनी विजय मिळवला आहे.
मिचेल मार्श याने ठोकलेल्या शतकी खेळीच्या जोरावर लखनौने आरसीबीसमोर पावसाने प्रभावित झालेल्या 19 ओव्हरच्या सामन्यात 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने या धावांचा शानदार पाठलाग केला. त्यामुळे आरसीबीला शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावांची गरज होती. मैदानात आरसीबीकडून स्फोटक फलंदाज रोमरियो शेफर्ड आणि कृणाल पंड्या ही सेट जोडी होती. त्यामुळे आरसीबीच्या विजयाची शक्यता होती. मात्र लखनौचा कॅप्टन ऋषभ पंत याने फिरकीपटू दिग्वेश राठी याला मोठ्या विश्वासाने शेवटची ओव्हर टाकायला दिली. राठीनेही कॅप्टन पंतचा विश्वास सार्थ ठरवला. राठीने यशस्वीपणे 20 धावांचा बचाव केला. राठीने अवघ्या 9 धावा दिल्या. त्यामुळे आरसीबीला 19 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 203 धावाच करता आल्या. आरसीबीने अशाप्रकारे सामना आपल्या नावावर केला.
एकाना स्टेडियममधील आकडेवारी
आयपीएल 2026 स्पर्धेत एकाना स्टेडियममध्ये 5 पैकी 2 वेळा विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. तर पहिले बॅटिंग करताना 2 संघाने विजय मिळवला आहे. तर 1 सामना हा अनिर्णित राहिला आहे. तसेच लखनौमध्ये आरसीबी एलएसजीवर वरचढ होती. आरसीबीने एलएसजीला लखनौत झालेल्या दोन्ही सामन्यांत पराभूत केलंय. त्यामुळे लखनौसमोर घरच्या मैदानात आरसीबी विरुद्ध पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान होतं. लखनौने हे आव्हान यशस्वीरित्या पेललं आणि विजय मिळवला.
लखनौचा तिसरा विजय, आरसीबीची निराशाजनक कामगिरी
दरम्यान लखनौने आरसीबीला पराभूत करुन 19 व्या मोसमातील आपला तिसरा विजय साकारला. लखनौच्या खात्यात 10 सामन्यानंतर आता 6 गुण झाले आहेत. तर आरसीबीचा हा या मोसमातील एकूण चौथा आणि सलग दुसरा पराभव ठरला. आरसीबीच्या खात्यात 10 सामन्यानंतर 12 गुण आहेत. मात्र त्यानंतरही आरसीबीकडे लखनौपेक्षा प्लेऑफची अधिक संधी आहे. तर लखनौने उर्वरित 4 सामने जिंकले तरी त्यांचे 14 गुणच होतील. त्यामुळे आता लखनौची उर्वरित सामन्यात कशी कामगिरी राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



