राज्यामध्ये तलाठ्यापासून ते मंत्रालयातील सचिवापर्यंत सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. राज्यातील सर्वसामान्य जनता वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे मेटाकुटीस आलेली आहे.
या सगळ्याचे मूळ शोधल्यास त्याचे कारण राज्यामध्ये बदल्यांमध्ये होत असलेली सौदेबाजी व दलाली असल्याचे स्पष्ट आहे. यामुळेच मला ऊस दराच्या आंदोलनाकडून बदल्यांच्या पारदर्शकतामध्ये लक्ष घालावे लागत असल्याचे राजू शेट्टी यांनी नमूद केले. (Maharashtra News)
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) हे कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बदल्यांबाबत राजू शेट्टींनी मुक्ताफळे उधळू नयेत असे विधान केले. त्यावर आज राजू शेट्टींनी त्यांची प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसच्या व भाजपच्या दोन्ही सरकारमधील वजनदार मंत्री आहेत. खरोखरच विखे पाटील यांना बदल्यामध्ये पारदर्शकता आले असल्याचे दाखवायचे असल्यास आणि त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी विधी व न्याय विभागाच्या धर्तीवर राज्यातील सर्व विभागाच्या बदल्या ऑनलाइन कराव्यात असेही राजू शेट्टींनी (raju shetti) नमूद केले.
राज्यातील विविध विभागांच्या बदल्यांमध्ये मंत्र्यांनी सौदेबाजी व दलाली न करता या सर्व बदल्या पैसे घेऊन केल्या आहेत हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही असंही राजू शेट्टी यांनी नमूद केले.