सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, सांगली ग्रामीण विभागातील संख, मिरज ग्रामीण 2, कवठेमहांकाळ, जत, तासगाव या उपविभागांतील 212 आकडेबहाद्दरांवर महावितरणकडून धडक कारवाई करण्यात आली. या भागातील वीज वाहिन्या आकडेमुक्त आणि भारमुक्तही झाल्या. त्यामुळे वीज यंत्रणेत 4.31 मेगावॅटचा वीज भार उपलब्ध झाला आहे. ही कारवाई अशीच पुढेही सुरू राहणार
आहे.
त्यामुळे आकडेबहाद्दरांचे धाबे दणाणले आहेत. संख उपविभागात 74, मिरज ग्रामीण 24, कवठेमहांकाळ 30, जत 49, तासगाव 35 आकडेबहाद्दर कारवाईत सापडले. प्रामुख्याने तिकोंडी, उमदी,पाडळी, आळते, हातनोली, कुमठे, उपाळवी या गावात कारवाई झाली. या कारवाईमुळे 4.31 मेगावॅटची अतिरिक्त वीज (electricity) उपलब्ध झाली आहे. सध्याची वाढती वीज मागणी व अपुरा पुरवठा यातील तूट भरून काढण्यासाठी महावितरणकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत.
वाढत्या तापमानवाढीत भारनियमन टाळून ग्राहकांना दिलासा देण्याचा महावितरणचा कसोशीने प्रयत्न सुरू आहे. वीज चोरांवर कारवाई ही त्याचा एक भाग आहे. वाढत्या वीज चोरीमुळे विजेची हानी वाढून यंत्रणेवर ताण येतो. वीज पुरवठा व मागणीचे गणित बिघडते. विजेच्या अनधिकृत वापराचा परिणाम वीज उपलब्धतेवर होऊन प्रामाणिक ग्राहकांना नाहक त्रास होतो. त्यामुळे महावितरणने आकडेबहादरांविरूध्द कडक मोहीम राबविण्यास सुुरुवात केली आहे. कवठेमहांकाळ व तासगाव येथे कार्यकारी अभियंता संदीप सानप व कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.