ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली महानगरपालिकेच्या सन 2005 ते 2010 या कालावधीच्या विशेष लेखापरीक्षणातून समोर आलेल्या विविध घोटाळ्यातील कोट्यवधी रुपयांची वसुली होणार आहे. त्याअनुषंगाने महापालिका प्रशासनाने शासनाला अहवाल पाठविला आहे. तत्कालीन दोषी पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी यांच्यापैकी कोणाकडून किती रक्कम वसूल करायची, याबाबतचा हा अहवाल आहे. त्यामुळे संबंधितांचे धावे दणाणले आहे.
महापालिकेतील विविध घोटाळे, गैरकारभार याविषयी शासनाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे महानगरपालिकेचे सन 2005 ते 2010 या कालावधीचे विशेष लेखा परीक्षण करण्यात आले. या लेखा परीक्षणात महानगरपालिकेतील विविध कामात गैरव्यवहार, अनियमीतता, बेकायदेशीर कामे झाल्याचे निदर्शनास आले. त्यावर लेखा परिक्षकांनी दोषींवर जबाबदारी निश्चित करून संबधीतांकडून रक्कम वसुल करणे आवश्यक असल्याची शिफारस शासनास केली होती.
विशेष लेखापरीक्षणातून गैरकारभार, अनियमितता उघड होऊनही कारवाई होत नसल्याने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने या तक्रारींची दखल घेत जबाबदारी निश्चित करून रक्कम वसुली करण्याचे आदेश शासनास दिले होते. शासनाने याप्रकरणी महापालिका प्रशासनास संबंधितांवर जबादारी निश्चीत करण्याचे आदेश दिले. मात्र कार्यवाही न झाल्याने न्यायालयात पुन्हा अवमान याचिका दाखल करण्यात आली होती.