ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : अंबाबाईच्या दर्शनाला सुमारे २५ लाख भाविक पर्यटक नवरात्रीत कोल्हापूरला येतील. त्यांच्यासाठी १२ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था केली आहे. एसटीची व्यवस्था केली आहे, तसेच दर दहा मिनिटाला केएमटीची सेवाही देण्यात येणार आहे. याशिवाय रिक्षा असोसिएशनशी चर्चा करून शासनाच्या खर्चाने भाविकांच्या सेवेत काही रिक्षावाहतुकीचीही सेवा देण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूरचे नूतन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी दिली.
पालकमंत्री म्हणून घोषणा होताच रत्नागिरीहून कोल्हापूरच्या संपर्कदौऱ्यावर आलेले मंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी सकाळी अंबाबाई आणि श्रीक्षेत्र जोतिबाचे दर्शन घेतले. अंबाबाई मंदिराच्या आवारात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन समितीशी, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांशी धावती भेट घेउन नवरात्रीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत खासदार धैर्यशील माने होते.
नवरात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका काढण्यात येणार आहे. त्याची छपाई तात्काळ पूर्ण करण्यात येईल असे सांगून केसरकर यांनी भाविक, देवस्थान समिती, महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने नवरात्रउत्सव निर्विघ्नपणे पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली. पूर्वतयारी पूर्ण झाली असून सुविधा कमी पडणार नाहीत, मात्र भाविकांनी रांगेतून दर्शन घ्यावे असेही आवाहन केले.