राज्यातील 126 ग्रामपंचायतींसाठी 1 नोव्हेंबरला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. यामध्ये कोल्हापूर जिह्यातील साळवण (ता. गगनबावडा), कौलगे (ता. गडहिंग्लज), रेंदाळ (ता. हातकणंगले), उजळाईवाडी व कणेरीवाडी (ता. करवीर) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या 100 व इतर 26 ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला. त्यानुसार 27 ऑक्टोबरला आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची सुचना देणे, 1 नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेत तहसिलदारांनी प्राधिकृत पेलेल्या अधिकार्याच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेवर आरक्षणाची (नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला) सोडत काढणे, 2 नोव्हेंबरला प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करणे, 4 नोव्हेंबरपर्यंत आरक्षणावर हरकती व सुचना दाखल करणे, 9 नोव्हेंबरला प्राप्त हरकतींवर प्रांताधिकार्यांनी अभिप्राय देणे, 10 नोव्हेंबरला प्रांताधिकार्यांनी दिलेला अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसुचनेस जिल्हाधिकार्यांनी मान्यता देणे, 11 नोव्हेंबरला जिल्हाधिकार्यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिध्दी देणे असा हा कार्यक्रम आहे.