राज्य निवडणूक आयोगाकडून प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील 7750 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.
यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच मोठी निवडणूक गावपातळीवर पार पडणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार असून मतमोजणी 20 डिसेंबरला पार पडेल.
कोल्हापूर जिल्ह्यातील नोव्हेंबर ते डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. 31 मे 2022 पर्यंत अस्तित्वात असलेली मतदार यादी गृहित धरण्यात आली आहे. जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींची निवडणूक महिनाभरात होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात 1, नोव्हेंबर महिन्यात 429, तर डिसेंबर महिन्यामध्ये 45 ग्रामपंचायतीचा कालावधी संपणार आहे. मुदती संपतील तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यातील ग्रामपंचायती खालीलप्रमाणे आहेत
करवीर 53
कागल 26
पन्हाळा 50
शाहूवाडी 49
हातकणंगले 39
शिरोळ 17
राधानगरी 66
गगनबावडा 21
गडहिंग्लज 34
आजरा 36
भुदरगड 44
चंदगड 40
मतदार जागृतीबाबत सायकल रॅली संपन्न
दरम्यान, मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुर्नरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती सायकल रॅली घेण्यात आली. शिवाजी विद्यापीठाचे अधिष्ठाता (सामाजिक शास्त्र) डॉ.एम.एस. देशमुख व उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्या हस्ते हिरवा झेंडी दाखवून शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारत येथून सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक अभय जायभाये, लोकशाही सुशासन आणि निवडणूक विभागाचे विद्यापीठ समन्वयक प्रा. डॉ.प्रल्हाद माने तसेच अन्य मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठ बहिस्थ शिक्षण (डिटन्स लर्निंग) इमारत पासून सुरुवात ते सायबर चौक ते माऊली चौक त्यानंतर सम्राट नगर त्यानंतर एनसीसी भवन शिवाजी युनिव्हर्सिटी गेट, समारोप – शिवाजी विद्यापीठाचे जिजामाता सभागृह या मार्गाने रॅली मार्गस्थ झाली. रॅलीत सहभागी विद्यार्थी/नागरिकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.