लांबलेला पावसाळ्यामुळे यंदाच्या वर्षी मागील महिन्यापर्यंत पंचगंगा नदीत मोठ्याप्रमाणात दुषीत पाण्याचा प्रवाह सुरू होता.यातच महापालिका, इचलकरंजीसह नदी काठच्या 174 ग्रामपंचायतीमुळे पंचगंगेत रोज सरासरी 200 दशलक्ष लिटरपेक्षा अधिक दुषीत पाणी विनाप्रक्रिया नदीत मिसळले. दुषीत पाण्यामुळे अनेक गावांत आता गॅस्ट्रोसारख्या जलजन्य आजारांनी विळखा घातला आहे. सरकारी आकडेवारी शेकड्यात असली तरी काही हजार लोक या आजाराची शिकार झाल्याची माहिती आहे. गॅस्ट्रो पाठोपाठ कावीळ, टायफॉईड आदी आजारांनी डोके वर काढले असतानाच पोटात दुषीत पाणी गेल्यानंतर साधारण दीड ते दोन महिन्यांनी काविळ
उमठते. कोल्हापुरकरांच्या आरोग्याच्या बाबतीत जिल्हाप्रशासन धिम्मच आहे.कार्यालयिन बैठकाशिवाय पुढे काहीच होताना दिसत नाही.नदी काठावरील सुमारे आठ लाख लोकांना असलेला हा जलजन्य आजारांचा धोका ओळखून योग्य उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.
कोल्हापूर महापालिका,इचलकरंजी शहर तसेच पंचगंगा नदी काठावरील प्रमुख 174 गावे, 2928 औद्योगिक कारखाने,साखर कारखाने, डिस्टिलरी इतर उद्योग व सात चर्मोद्योग, शेकडो रुग्णालये, कत्तलखाने, हॉटेल्स व खानावळ,आदी घटक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पंचगंगा मैली करण्यात हातभार लावत आहेत. पावसाळ्यानंतरही अतिरिक्त पाणी नाले आणि गटारीतून थेट नदीत मिसळत आहे. अंदाजे रोज किमान 200 दशलक्ष लिटर सांडपाणी नदीत मिसळल्याचा तज्ञांचा अंदाज आहे.पंचगंगा नदी काठावरील सुमारे 8 लाख 34 हजार लोकसंख्या नदीतील पाणी पिते. नदीतील दुषीत पाण्यामुळे पिणायांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.काळजी घेण्याचे आवाहन करण्यापलिकडे प्रशासन पातळीवर काहीच हालचाल होताना दिसत नाही. पंचगंगा प्रदूषणाबाबत कागदी घोडे तसेच वातानुकुलित कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्या जोर बैठका सुरू आहेत. जलजन्य आजारांची पातळी,धोका उपाययोजना याबाबत योग्य उपायोजना वेळीच केल्या तरच यातून दिलासा मिळेल.
दवाखाने झाले फुल्ल
रोगजंतूंसाठी असे पोषक वातावरण निर्माण झाल्याने जिह्यात विविध रोगांनी डोके वर काढले आहे. दूषित पाणी पिण्यात आल्याने पोटाचे विकार, जुलाब, हगवण अशी लक्षणे असलेले रुग्ण घराघरांमध्ये आढळून येत आहेत.तसेच ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशी लक्षणे असलेले रुग्णही दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत.सर्वोपचार रुग्णालयासह खासगी दवाखाने रुग्णांनी फुल्ल झाल्याचे चित्र आहे.
पावसाळ्यानंतर वातावरणात ओलावा असल्याने रोगजंतुना तो पोषक ठरतो.त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.पाणी उकडून पीणे,उघड्यावरील पदार्थ न खाने,स्वच्छता बाळगणे अशा प्रकारच्या खबरदारी घेतल्यास आजारांपासून बचाव करता येतो.आजारी पडल्यास वैद्यकीय तज्ञांच्या सल्याने उपचार करून घ्या. – डॉ. शैलेश सावंत (वैद्यकीय तज्ञ)






