Friday, May 17, 2024
Homeकोल्हापूरधैर्यशील माने-राजू शेट्टींविरुद्ध उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला! हातकणंगलेमध्ये समीकरणं बदलणार

धैर्यशील माने-राजू शेट्टींविरुद्ध उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला! हातकणंगलेमध्ये समीकरणं बदलणार

पक्षात झालेलं बंड आणि अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिल्यानं ठाकरेंसमोर मोठं आव्हान ठाकलेलं आहे. आमदार आणि खासदारांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर ठाकरेंनी महाराष्ट्रभर पुन्हा पक्षबांधणी सुरू केलीये.

विशेषतः बंडखोरांच्या मतदारसंघांवर उद्धव ठाकरेंनी लक्ष्य केंद्रीत केलेलं दिसत आहे. कारण ठाकरेंनी आता हातकणंगले मतदारसंघात महत्त्वाची खेळी केलीये. धैर्यशील माने आणि राजू शेट्टींना आव्हान देईल अशा हाजी असलम बादशाह सय्यद यांनी ठाकरेंच्या गटात प्रवेश केलाय. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघातील समीकरणं बदलू शकतात.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी त्यावेळचे खासदार राजू शेट्टी यांना पराभूत केलं होतं. पण, 2022 च्या शिवसेनेतल्या बंडानंतर धैर्यशील माने बाळासाहेबांची शिवसेना पक्षात गेले. त्यामुळे ठाकरेंनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पर्यायांची चाचपणी सुरू केली होती. त्यातच राजू शेट्टींना झटका देणाऱ्या हाजी असलम बादशाह सय्यद यांनी प्रवेश केल्याने उद्धव ठाकरेंचा उमेदवाराचा शोध संपल्याचं म्हटलं जात आहे.

धैर्यशील माने यांनी शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरे गटातून त्या जागेवर उमेदवार कोण असा सावल केला जाऊ लागला होता? अशातच त्या जागेवर ठाकरेंकडून राजू शेट्टी उमेदवार असणार अशीही चर्चा सुरू होती, मात्र त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय… कारण उद्धव ठाकरेंनी असा नेता आपल्या गटात घेतलाय ज्यांनी फक्त धैर्यशील मानेंची नाही तर राजु शेट्टींची डोकेदुखी वाढवली आहे.

2019 मध्ये शिवसेनेच्या धैर्यशील मानेंचा हातकणंगले लोकसभा मतदार संघातून विजय झाला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचा लाखांनी पराभव करणारा तरुण नेता म्हणून मानेंनी ओळख मिळवली. पण, असं असलं तरी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची लढत फक्त दोघांमध्ये झाली नव्हती. त्याच्यात अजून एक नाव होतं, ते नाव म्हणजे हाजी असलम बादशाह सय्यद!

सय्यद यांनी 2019 मध्ये हातकणंगले मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढली होती. त्यांचा या निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव झाला होता. पराभव जरी झाला असला, तरी त्यांना मिळालेली मतं निर्णाय होती, कारण असं सांगितलं गेलं की, राजु शेट्टी यांच्या पारड्यात जाणारी मतं हाजी असलम बादशाह सय्यद यांच्याकडे वळली.

धैर्यशील माने यांना 5,85,776 मतं मिळाली होती, तर राजू शेट्टी यांना 4,89,737 मतं मिळाली होती. हाजी असलम बादशाह सय्यद यांना लोकसभा निवडणुकीत 1,23,419 मतं मिळाली होती. त्यामुळे हाजी असलम बादशाह यांची मतं राजू शेट्टींच्या पारड्यात गेली असती, तर शेट्टींचा विजय होऊन धैर्यशील माने यांना पराभवाला सामोरं जावं लागलं असतं. त्यामुळे लाखभर मतं घेणार हाजी असलम बादशाह सय्यद यांची उमेदवारी महत्त्वाची ठरली होती.

आता याच सय्यद यांना धैर्यशील मानेंविरोधात आमनेसामने लढवण्याचा निर्णय ठाकरे घेऊ शकतात. हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाचा कोणताच मोठा चेहरा नसल्यामुळे राजू शेट्टींना संधी मिळू शकते, अशी चर्चाही सय्यद यांच्यामुळे मावळली आहे. त्यामुळे धैर्यशील माने टक्कर देण्यासाठी ठाकरे हाजी असलम बादशाह सय्यद यांना मैदानात उतरवणार का आणि ते ठाकरेंचा विश्वास सार्थ ठरवणार का? या प्रश्नांमुळे हातकणंगले मतदारसंघातील समीणकरणं बदलेली बघायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -