लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे सुरक्षाकवच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापनाने कडक केले आहे.
सध्या देशात सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती व कोल्हापुरातील पर्यटन हंगामात होणार्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील सुरक्षेबाबत दक्षता घेतली जात आहे. मंदिरातील प्रवेशद्वार, बॅग काऊंटर, बॅग तपासणी कक्ष, सीसीटीव्ही कक्ष येथे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आली आहे.
काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याला चोख उत्तर देण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवली आहे. बहुतांश हल्ल्यांच्या घटनांमध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटनस्थळांना लक्ष्य केले जात असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव देशातील पर्यटनस्थळ परिसरातील सुरक्षा वाढवली जात आहे. अद्याप कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराची सुरक्षा वाढवण्याबाबत जिल्हा प्रशासनाला विशेष सूचना आली नसली तरी प्राथमिक दक्षता म्हणून स्थानिक पातळीवर देवस्थान व्यवस्थापनाने सुरक्षेवर लक्ष दिले आहे.
सध्या उन्हाळी पर्यटनाचा हंगाम आहे. शालेय सुट्ट्या असल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होणार्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. अंबाबाई मंदिराच्या चारही प्रवेशद्वारावर असलेल्या मेटल डिटेक्टर दरवाजांसह बॅग काऊंटर, बॅग तपासणी कक्ष, सीसीटीव्ही कॅमेर्यातील फुटेज याची सातत्याने पाहणी करण्यात येणार आहे. सध्या मंदिर आवारात असलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेर्यातील प्रत्येक दृश्यावर कक्षातील स्क्रीनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.