शिवाजी उद्यमनगर येथे पोलिस असल्याची बतावणी करत एका व्यावसायिकाची लूटमार करणार्या तीन तोतया पोलिसांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्यांची नावे आय्याज युसूफ मुलानी (वय 23), स्मित संतोष पवार (21, दोघेही रा.करंजेपेठ, सातारा) आणि शुभम तानाजी गायकवाड (28, रा. शिकलगार गल्ली, बागल चौक, कोल्हापूर) अशी आहेत. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
कटलरी आणि बांगड्यांचे व्यावसायिक असलेले चिदानंद बामन्ना सुतार (48, रा. जैन बस्ती, दत्तवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), हे बांगड्या व कटलरी साहित्य खरेदी करून 28 मे रोजी रात्री उशिरा गावी जात होते. शिवाजी उद्यमनगर येथून जात असताना, तीन संशयितांनी पोलिस असल्याची बतावणी करत त्यांच्याजवळील 7 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्याचबरोबर त्यांना मारहाण करून ते पळून गेले. सुतार यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांची ओळख पटवली आणि त्यांना बागल चौक येथून अटक केली. तिघांनीही चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून रोख 4 हजार रुपये, दोन मोबाईल फोन आणि दुचाकी असा 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी राजारामपुरी पोलिस अधिक तपास करत आहेत.