सोमवारपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गतीने वाढ होत चालल्याने मंगळवारी दुपारी ४ वाजता महापालिका प्रशासनाकडून नदीवरील जुना पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. धरण पाणलोट क्षेत्रासह इचलकरंजी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे झपाट्याने वाढत होती. परिणामी २४ जून रोजी पाणी जुन्या पुलाला घासू लागल्याने महापालिका प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बॅरिकेट लावून बंद केला होता.
या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनचे संजय कांबळे व कर्मचारी चोवीस तास कार्यरत होते. त्यामुळे केवळ नवीन पुलावरूनच वाहतूक सुरु राहिल्याने येथे वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात दिसत होती. याचा मनस्ताप वाहनधारकांना होत होता. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने अखेर सहा दिवसानंतर म्हणजे ३० जून रोजी पंचगंगेची पाणी पातळीत घट होऊन ती ५३.६ फुटावर पोहोचली. त्यानंतरही पाणीपातळी संथगतीने कमी होत असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे सोमवारी दुपारी १२ वाजता जूना पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यामुळे मोठ्या वाहनांसह दुचाकीस्वारांची होणारी कुचंबणा थांबली होती. परंतु सोमवार दुपारपासुन पावसाने पुन्हा हजेरी लावली असून पाणी पातळीत गतीने वाढ होत चालली आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी ४ वाजता जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरिकेट लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे.