चित्रपटातील ‘खून का बदला खून’ अशा वृत्तीतून तीन महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी साद पठाणवर हल्ला केला. मागील भांडणात सादने आदित्य ओव्हाळच्या ‘पापणीवर जसा वार केला तसाच वार’ करून हा बदला घेतला, अशी खबळबजनक कबुली दिली.
एक-दोन नव्हे, तर १२ वार करून सादला संपविले. दोन टोळ्यांत सुरू झालेल्या या ‘बदल्याच्या खेळाचा’ साद बळी ठरला आहे.
जिल्ह्यातील टोळीयुद्धांचा भडका काही दिवस शांत होता. विक्रमनगरातील ‘डबल मर्डर’ प्रकरणातील संशयितही आता अशा प्रकारांपासून चारहात लांब असल्याचे दिसून येते. मात्र, पुन्हा काही नव्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.
‘कोल्हापूरचा किंग’ बनण्याची धडपड…
सोशल मीडियावरून एकमेकांना खुन्नस, आव्हाने देण्याचा फंडा अलीकडे वाढला आहे. एखाद्या चित्रपटातील वाक्यासोबत म्होरक्याचे फोटो व्हायरल करणे, मुक्काम कळंबा कारागृह असे लिहून प्रतिआव्हाने देण्याचे प्रकार सुरू आहेत. ‘कोल्हापूरचा किंग’ ही बिरुदावली मिरविण्यासाठी काही टोळक्यांची धडपड सध्या सुरू आहे. सादच्या खुनातील संशयितांकडून आणि त्याच्या साथीदारांकडूनही असेच काही प्रकार सुरू होते.
रिक्षा व्यवसायावर गुजराण…
साद पठाण याचा मोठा भाऊ, वडील दोघेही रिक्षा व्यवसाय करतात. सादही दिवसभर रिक्षा चालवायचा. सहा जणांचे कुटुंब या व्यवसायावर जगत होते. मात्र, काही वाईट संगतीत अडकलेल्या सादनेही गुंडांसोबत वावर वाढवला. टेंबलाई टेकडीजवळ तो त्याच्या रिक्षात मद्यप्राशन करताना अनेक जण त्याच्या पैशावर मजा घेत होते. यातीलच काही जणांनी त्याची ‘टीप’ सोमवारी रात्री समोरील गटाला दिल्याची चर्चा आहे.






