गेल्या पाच दिवसांमध्ये इंधनाचे दर तब्बल तीन रुपये वीस पैशांनी वाढले आहेत. पेट्रोल, डिझेल महाग झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक ताण आला आहे. महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या सामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सीएनजीवरच्या व्हॅटमध्ये घट करण्याची घोषणा केली होती. त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेप्रमाणे इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) 13.5 टक्क्यांवरुन तीन टक्के करण्यात आला आहे. दिनांक एक एप्रिलपासून सीएनजीचे सुधारित दर लागू होणार आहेत. सीएनजी स्वस्त होणार असल्याने याचा मोठा फायदा हा ऑटो रिक्षा चालकांसह प्रवासी वाहतूक करणाऱ्या इतर वाहनचालकांना आणि नागरिकांना होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे मोठ्याप्रमाणात प्रदूष होते. सीएनजीचे दर कमी झाल्याने आता अशा वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या वायू प्रदूषणाला देखील आळा बसू शकतो.
अजित पवार अर्थसंकल्पात म्हणाले होते की, युक्रेन आणि रशिया युद्धाचा साऱ्या जगावर परिणाम होईल. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महागाई वाढणार असल्याचे सांगितले आहे, असा उल्लेख करून त्यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना सुखद धक्का दिला होता. सीएनजीवरील मूल्यवर्धित कर साडेतेरा टक्क्यांवरून तीन टक्के करायचा प्रस्ताव त्यांनी अर्थसंकल्पात मांडला होता. या निर्णयामुळे सरकारचा 800 कोटींचा महसूल बुडेल. मात्र, सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले होते. सीएनजीवरील व्हॅट कमी केल्याने प्रदूषणाला आळा बसणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान आता येत्या एक एप्रिलपासून सीएनजीचे सुधारित दर लागू होणार आहेत. सीएनजीचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.