जिल्ह्यातील १२९ गावांना महापुराचा व ८६ गावांना भूस्खलनाचा धोका आहे. या गावांची यादी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने काढली असून, १५ जुलै ते १५ ऑगस्ट या महिन्याभरात या गावांवर विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
यात सर्वाधिक गावे शिरोळ आणि करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील आहेत, तर गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड या गावांना पुराचा जराही धोका नाही.
मे महिना मध्यावर आहे तोपर्यंत जिल्ह्यात वळवाच्या पावसाचा तडाखा आहे. त्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस असल्याने त्यामुळे जुलै, ऑगस्ट महिना कसा जाईल याची कोल्हापूरकरांना चिंता आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पूरबाधित होणाऱ्या व भूस्खलन होणाऱ्या गावांची यादी काढली आहे.
संभाव्य पुराचा धोका असलेल्या तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे दौरे सुरू आहे. स्थलांतरित नागरिकांसाठी निवारा केंद्रे, औषधोपचार, जेवण, स्वच्छतागृहांची साेय, जनावरांसाठी चारा, आपत्ती व्यवस्थापनाचे बचावाचे साहित्य यांची तयारी केली जात आहे.
दुसरीकडे गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड या तालुक्यांमधील कोणत्याही गावात पुराचा अजिबातच धोका नाही. येथील मोजक्या गावात काही प्रमाणात भूस्खलन होते.
तालुका : पूरबाधित गावांची संख्या : भूस्खलन होणारी गावे : नद्या
शिरोळ : ३७ : कृष्णा, दूधगंगा, वारणा, पंचगंगा.
करवीर : २३ : ४ : भोगावती, कुंभी, कासारी, पंचगंगा
हातकणंगले : २१ : १ : वारणा, पंचगंगा
कागल : ११ : ३ : दूधगंगा, वेदगंगा.
पन्हाळा : ११ : ९ : कासारी, कुंभी
राधानगरी : ११ : ३१ : भोगावती, दूधगंगा
गगनबावडा : ७ : ४ : कुंभी
शाहूवाडी : ५ : २० : वारणा, कडवी, कासारी.
भुदरगड : ३ : १२ : वेदगंगा
गडहिंग्लज : ० : १ :
आजरा : ० : ४
चंदगड : ० : १
एकूण : १२९ पूरबाधित गावे : ८६ भूस्खलन होणारी गावे