राज्यामध्ये यंदा सर्वसाधारण वेळेपेक्षा अगोदरच मॉान्सूनने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने याबाबत माहिती दिली होती. राज्यातील अनेक धरणांमध्ये मुबलक पाणीसाठी पूर्वमौसमी पावसामुळे निर्माण झाला आहे.
त्यामुळे आता धरणातील विसर्गावर लक्ष असणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाची उघडीप असली तरी दुपारपासून अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाल्याने पुन्हा चिंतेत भर पडली आहे. अजूनही नद्यांचे पाणी वाढत असल्याने उपसा पंप काढावे लागत आहेत. अनेक गावांच्या पिण्याच्या पाणी योजनाही बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. १२ ते २७ मे अखेर झालेल्या पावसामुळे सुमारे २२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच राधानगरी धरण निम्मे भरले आहे. धरणातील सोमवारचा पाणीसाठा ३.९६ टीएमसी होता. धरणाची क्षमता ८.३६ टीएमसी आहे. वेधशाळेने यंदा पाऊस लवकर सुरू होणार, असा अंदाज देऊनही भोगावती नदीवरील एकूण १४ बंधाऱ्यांतील बरगे काढण्याचे काम झालेले नाही. त्यामुळे आजघडीला धरणातून विसर्ग ५०० क्युसेकपेक्षा अधिक विसर्ग करण्यावर मर्यादा येत आहेत.
धरणात पाणी अडविण्यास सुरुवात झाल्यापासून यंदा पहिल्यांदाच मेमध्ये तसेच जिल्ह्यात मॉन्सून सुरू होण्याआधीच असे घडले आहे. जूनमध्ये संततधार पाऊस झाल्यास धरण अवघ्या दोन-तीन आठवड्यांत भरले, अशी स्थिती आहे. यामुळे आता जलसंपदा विभागाने धरणातील पाणीसाठा कमी करण्याचे नियोजन केले आहे.
धरणातून वीजनिर्मितीसाठी ५०० क्युसेक विसर्ग दोन दिवसांपासून सुरू आहे. बंधाऱ्याचे बरगे काढण्याचे काम सततच्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे रखडले आहे. त्यामुळे वीजनिर्मितीसाठी अधिक क्षमतेने पाणी वापरून विसर्ग वाढविण्यात अडसर आला आहे. काही शेतकऱ्यांनी भात पिकांसाठी शेतात मशागतीची कामे पूर्ण केली होती. उर्वरित ज्वारी, भुईमूग व सोयाबीन या पिकांच्या मशागतीसाठी कामे सुरू झाली होती.