महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभातून वगळले होते. परंतु, या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दुपारी दिलासा दिला. या शेतकऱ्यांना योजनेतून वगळले जाणार नाही, याबाबत शासन निर्णय त्वरित काढण्याचे निर्देश देत असल्याचे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयातून केले आहे. खासदार धैर्यशील माने आणि प्रकाश आबिटकर यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्याचेही ट्विटमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी या ट्विटमध्ये खासदार धैर्यशील माने व आमदार आबिटकर यांचे फोटोही पोस्ट केले आहेत. यामुळे राज्यातील ९ पूरग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
२०१९ मध्ये आलेल्या महापुरात पूरग्रस्त शेतकऱ्यांना तत्कालीन सरकारने कर्जमाफी दिलेली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना नव्याने कर्जमाफी मिळणार नाही, असे महाविकास आघाडी सरकारकडून संकेत दिले होते. यासाठी जाचक अटी घातल्यामुळे राज्यातील लाखो पूरग्रस्त आणि नियमित कर्ज भरणारे शेतकरी लाभापासून वंचित राहणार होते. यामुळे शेतकऱ्यांकडून प्रचंड असंतोष पसरला होता. याची दखल घेवून खासदार धैर्यशील माने आणि आमदार आबिटकर यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून हा गंभीर प्रकार त्यांच्या निदर्शनास आणला होता. त्यानंतर दुपारी तातडीने मुख्यमंत्री कार्यालयातून या शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले जाणार नाही असे ट्विट करण्यात आले.