सांगली ग्रामीण पोलीस (police) ठाणे हद्दीतील गुन्हेगार उमेश घोलप टोळी आणि विश्रामबाग हद्दीतील गुन्हेगार अमोल कुच्चीकोरवी या दोन टोळीला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आलं आहे.
सांगली पोलीस (sangli police) अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. या कठोर निर्णयामुळं गुन्हेगारीला आळा बसणार आहे.
ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील टोळीप्रमुख उमेश घोलप (अंकली) तसेच ओंकार चंद्रकांत भोरे (अंकली) यांच्याविरुद्ध गेल्या सात वर्षात कुंटणखाना चालवणे, मुलींची छेड काढणे, अल्पवयीन मुलीस पळवून नेणे, सरकारी कामात अडथळा आणणे, दुखापत करून जबरी चोरी, अनधीकृतपणे घरात घुसून मारहाण करणे, सरकारी नोकरावर हल्ला करून दहशतवाद माजवणे, गर्दी मारामारी असे गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत.
दोघेजण कायदा जुमानत नसल्यामुळे पोलीस कायदा कलम 55 नुसार ग्रामीण पोलिसांनी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. दोघांना सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दीक्षित गेडाम यांनी दिला आहे.
विश्रामबाग हद्दीतील टोळीप्रमुख अमोल गंगाप्पा कुच्चीकोरवी आणि अमोल जगन्नाथ सरगर, विनोद रामचंद्र मोहिते या टोळीविरुद्ध (सन 2016 ते 21) या काळात खुनाचा प्रयत्न, घातक हत्यारने दुखापत करणे, गर्दी, मारामारी, संघटित गुन्हे असे तीन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्धही विश्रामबाग पोलिसांनी तडीपारचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक गेडाम यांना पाठवला होता. गेडाम यांनी तिघांना सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.