ताजी बातमी ऑनलाईन टीम
देशाला ज्याप्रमाणे राष्ट्रगीत आहे. त्याप्रमाणे आता महाराष्ट्राला राज्यगीत मिळणार आहे. लवकरच ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गिताला राज्यगीताचा मान मिळणार आहे. हे गाणं राज्याचं अधिकृत गीत म्हणून सरकारशी संबंधित सर्व औपचारिक कार्यक्रमांमध्ये वाजवणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. या गितातून दोन कडवे कमी केले जाणार असल्याची माहिती देखील मुनगंटीवार यांनी दिली आहे. हे गीतकवी राजा बधे यांनी लिहिलं असून श्रीनिवास खळे यांनी ते संगीतबद्ध केले आहे, तर शाहीर साबळे यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे.
महाराष्ट्राचं राज्यगीतच्या शर्यतीत तीन गितांचा समावेश होता. ‘जय जय महाराष्ट्र माझा’सोबतच, ‘बहु असोत सुंदर संपन्न की महान’ आणि ‘मंगल देशा पवित्र देशा’ या तीन गाण्यांचा पर्याय होता. यात जय जय महाराष्ट्र माझा या गीताचा निवड करण्यात आली. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीताला राज्यगीताचा मान लवरच मिळणार आहे. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याआधी फोनवर बोलताना हॅलो ऐवजी वंदे मातरम बोलण्याचे आवाहन केले होते. तसेच या संदर्भात राज्य सरकारने जिआर देखील काढला होता.