महादेवी हत्तीण नांदणी मठाकडे पाठविण्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीने निर्णय घेण्यासंदर्भातचा निर्णय शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व मठाकडून करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर दिला आहे.
याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर सोमवारी किंवा मंगळवारी उच्चस्तरीय समितीकडे नांदणी मठ, राज्य शासन व वनताराकडून अर्ज दाखल होणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाचे अॅड. मनोज पाटील व अॅड. आनंद लांडगे यांनी दिली.
नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी महादेवी हत्तिणीसंदर्भात न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयासमोर राज्य सरकारचे वकील अॅड. धर्माधिकारी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून हत्तिणीला वनतारा येथे पाठविण्यात आले आहे. तथापी राज्यामध्ये कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने राज्य सरकारने वनतारा आणि नांदणी मठाशी समन्वय साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करून नांदणी मठाच्या स्वत:च्या जागेमध्ये वनाताराच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत हत्ती पुनर्वसन केंद्र तातडीने उभा करून त्या ठिकाणीच हत्तिणीवर पुढील उपचार करण्याचे ठरले आहे.
दरम्यान, महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी विविध पावले उचलली जात आहे. नांदणीत हत्ती पुनर्वसन केंद्र उभारण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. याचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. त्यामुळे महादेवी हत्तीण येण्याची सर्वांना आस लागून राहिली आहे.