सर्व्हर डाउन झाल्यामुळे बुधवार (ता. १५) पासून शहरातील बहुतांश रास्त भाव धान्य दुकानातील धान्यपुरवठा थांबला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत ग्राहकांना धान्यासाठी ताटकळत थांबावे लागत आहे.
पुरवठा विभागातील रेशनकार्डमधील दुरुस्तीची कामेही रखडली आहेत.
दिवाळी तोंडावर आहे. घरात फराळाचे जिन्नस बनवण्याची घाई सुरू आहे. त्यातच रास्त भाव धान्य दुकानातील धान्य मिळायचे बंद झाले. कारण त्यांचा सर्व्हर डाऊन झाला आहे. त्यामुळे आता रोज सकाळी रास्त भाव धान्य दुकानदारांना फोन करायचा, सर्व्हर सुरू असेल तरच धान्य घ्यायला जायचे, अशी वेळ ग्राहकांवर आली आहे. शहरातील केवळ ३० टक्केच धान्य वाटून झाले आहे, अद्याप ७० टक्के धान्य वितरण झालेले नाही. त्यातच भर म्हणून आता बोटांचे ठसे घेण्यासाठी नवा स्कॅनर आला आहे.
या स्कॅनरमुळे ठसे लवकर मिळत नाहीत. त्यामुळे धान्य वितरणाची गती कमी होते. त्यातून दुकानदार आणि ग्राहक यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. ऐन सणात ही धावपळ करावी लागत असल्याने दुकानदार आणि ग्राहक दोघांनाही नाहक त्रास होत आहे. या समस्येवर कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
तीन महिन्यांचे धान्य का नाही?
शासनाने तीन महिन्यांचे धान्य एकदम देण्याचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय केवळ एकदाच अमलात आणला. त्यानंतर पुन्हा महिन्याचे महिन्याला धान्य देणे सुरू झाले. एकदाच तीन महिन्यांचे धान्य का दिले, असा सवाल ग्राहकांतून विचारला जात आहे.
आनंदाचा शिधा गेला कोठे?
शासनाने गेल्यावर्षी काही सणांना आनंदाचा शिधाची भेट दिली होती, मात्र या वर्षी दिवाळीलाही आनंदाचा शिधा दिला गेला नाही. त्यामुळे ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
शिधापत्रिकेची कामे रखडली
सर्व्हर डाउन झाल्याने पुरवठा विभागातील शिधापत्रिकेतील दुरुस्ती, नवी शिधापत्रिका काढणे ही कामे रखडली आहेत. इथेही नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.