मुरगूड शहरातील गावभागात वेदगंगा नदीकाठावर असलेल्या वैकुंठभूमी स्मशानभूमीत टाचण्या मारलेले सव्वाशे लिंबू विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. आज (दि.६) पहाटे उघडकीस आलेल्या या अघोरी प्रकारामुळे खळबळ उडाली.
अज्ञात व्यक्तींनी केलेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.
स्मशानभूमीच्या परिसरात अज्ञातांकडून प्रत्येक लिंबूला अकरा टाचण्या मारलेले सव्वाशे लिंबू टाकण्यात आले आहेत. हे या परिसरातून जा – ये करणाऱ्या नागरिकांना आढळून आले. हा करणीचा प्रकार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरु आहे. स्थानिक नागरिकांनी स्मशानभूमीतील हे लिंबू जमा करून इतरत्र त्याची विल्हेवाट लावली. पण असला अघोरी प्रकार मुरगूडमध्ये प्रथम घडल्याने त्याबद्दल आश्चर्य व संतापही व्यक्त होत आहे.



