कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील भाडळे खिंड येथे झालेल्या ट्रक व दुचाकीच्या अपघात पारस आनंदा परीट व सुरज ज्ञानदेव ( दोघेही रा .आंबर्डे ता. शाहूवाडी ) जागीच ठार झाले. कोल्हापूर येथे भरतीसाठी ते दुचाकी मोटारसायकलवरून गेले होते. दोघा तरुणांच्या अपघाती मृत्यूने आंबर्डे गावावर शोककळा पसरली आहे.
सैन्यभरतीची परीक्षा कोल्हापुरात देऊन घरी परतणाऱ्या दोघा तरुण मित्रांवर आज रात्री काळाने झडप घातली. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील भाडळे खिंड येथे ट्रकने पाठीमागून ठोकरल्याने मोटारसायकलस्वार दोघे तरुण जागीच ठार झाले. सूरज ज्ञानदेव उंड्रीकर (वय २०) व पारस आनंदा परीट (१९, दोघेही रा. आंबर्डे, ता. शाहूवाडी) अशी त्यांची नावे आहेत. एकाच गल्लीत राहणाऱ्या दोघा जिवलग मित्रांचे सैनिक भरतीचे स्वप्न अपूर्ण राहिले.
याबाबत शाहूवाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः आंबर्डे या खेडेगावातील सूरज व पारस गेली दोन वर्षे सैन्य भरतीसाठी प्रयत्न करत होते. कोल्हापूर येथे आज भरती असल्याने दोघेही मोटारसायकल (एमएच ०९ जीएस १६०४) वरून कोल्हापूरला गेले होते. भरतीची परीक्षा देऊन परतत असताना भाडळे खिंड येथे रात्री साडेसातच्या दरम्यान अपघात झाला. त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून येणाऱ्या ट्रक (एमएच ०९ एल २९२५) ने जोराची धडक दिली. त्यामुळे सूरज व पारस दोघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यात दोघांच्याही डोक्याला जबर मार लागला. दोघेही गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळी रक्ताचे थारोळे साचले होते.
सूरजचे वडील कोल्हापूर येथे हॉटेलमध्ये कामगार आहेत. तो एकुलता मुलगा होता. त्याला तीन विवाहित बहिणी आहेत. अत्यंत गरीब कुटुंबातला मुलगा अचानकपणे अपघातात गेल्याने उंड्रीकर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पारसचे वडील शेतकरी असून, गावात शिंपी काम करतात. त्याला एक मोठा भाऊ आहे. दोन्ही तरुण गरीब व कष्टकरी कुटुंबातील होतकरू मुले आहेत. दोघांच्या आई-वडील व कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटणारा होता. या घटनेमुळे आंबर्डे गावावर शोककळा पसरली आहे.दरम्यान, मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दोघांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.




