Saturday, July 27, 2024
Homeकोल्हापूरखोट्या सर्पमित्रांमुळं सापाचं अस्तित्व धोक्यात; Social Media वर प्रसिद्धीसाठी 'असा' केला जातोय...

खोट्या सर्पमित्रांमुळं सापाचं अस्तित्व धोक्यात; Social Media वर प्रसिद्धीसाठी ‘असा’ केला जातोय वापर

 

प्रत्येक वेळी साप (Snake) पकडणारा त्यांचा मित्रच असतो असे नाही. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी, तर कधी तस्करी करण्यासाठी काही खोटे सर्पमित्र जंगलात आढळणारे विषारी साप शहरात मागवतात. त्यांच्यासोबत ‘फोटो सेशन’ करतात आणि सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्ध करतात.त्यानंतर या सापांना शहराच्या आसपास सोडतात. त्यामुळे असे विषारी साप शहरात दिसत आहेत. काही खोटे सर्पमित्र सापांच्या विषाची तस्करी करण्यातही सहभागी असल्याचे वन विभागाचे (Forest Department) निरीक्षण आहे. साप पकडण्याचे प्रशिक्षण घेतलेला, सापांना जीवदान देणारा म्हणजे सर्पमित्र म्हणून ओळखला जातो.जिल्ह्यात असे अनेक चांगले सर्पमित्र आहेत; पण शहरात आणि ग्रामीण भागातही काही साप पकडता येणारे आपल्या प्रशिक्षणाचा दुरूपयोग करत आहेत. शहर आणि परिसरात न आढळणारा एखादा साप जंगली भागातून शहरात मागवायचा, त्याच्यासोबत फोटो काढायचे, त्याची माहिती सांगणारे व्हिडिओ करायचे आणि तो शहराच्या आसपास रिकाम्या जागेत सोडून द्यायचा. हा त्या सापाचा अधिवास नाही.त्यामुळे त्याला लागणारे अन्न मिळत नाही. त्यामुळे भुकेने तो मरून जातो, तर कधी कोणीतरी व्यक्ती घाबरून त्या सापाला मारते. त्यामुळे या खोट्या सर्पमित्रांमुळे साप धोक्यात आल्याचे पाहायला मिळते. काही ठिकाणी खोटे सर्पमित्र शिकारीच्या गुन्ह्यातही सापडले आहेत. वर्षभरात ५ हजार सापांना जीवदानवन विभागाच्या ॲनिमल रेस्क्यू टीम आणि शहर व परिसरातील चांगले सर्पमित्र यांनी या वर्षभरात सुमारे ५ हजार सापांना जीवदान दिले आहे. यासाठी वन विभागाने प्रामाणिक आणि चांगल्या सर्पमित्रांचा एक सोशल मीडिया ग्रुप बनवला आहे. त्यांनी साप पकडला की, त्याची माहिती आणि कोठे साप सोडला, याचे व्हिडिओ, फोटो वन विभागाच्या ग्रुपवर टाकले जातात. त्यामुळे वन विभागाकडे नेमकी माहिती येते. या सर्पमित्रांच्या मीटिंगही घेतल्या जातात. २०१९ च्या महापुरानंतर शहरात सापांचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण आहे.शहर परिसरात विषारी सापजंगलातील खडकाळ भागात असणारा सॉसकेल वायपर हा विषारी साप आता शहर परिसरात दिसू लागला आहे. अशाच पद्धतीने तो त्या भागातून येथे आणला जाण्याची शक्यता वन विभागाच्या रेस्क्यू टीमने वर्तवली. बांबूपिट वायपर हा विषारी सापही शहरात दिसू लागला आहे. शहर आणि परिसरात या वर्षांत ५ अजगर पकडले गेले. अजगराचा अधिवास शहर व आसपासचा परिसर नाही. मण्यार हा अत्यंत विषारी असणारा साप गवताळ प्रदेश, माळ, किंवा मानवी वस्तीपासून लांब अंतरावर सापडतो; मात्र मानवी वस्ती वाढल्याने त्याचे अधिवास नष्ट झाले. पर्यायाने आता शहराच्या मध्य वस्तीतही मण्यार सापडू लागला आहे. सापाला योग्य पद्धतीने पकडणे आणि त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे हे सर्पमित्राचे मुख्य काम आहे; मात्र काही जण सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी सापांची हेळसांड करतात. हे अयोग्य आहे. वन विभागाच्या साहाय्याने सापांना जीवदान देणे गरजेचे आहे. -प्रसाद नामजोशी, सर्पमित्र.सर्पमित्रांना पूर्वी आयकार्ड दिले जात होते; मात्र काही चुकीच्या घटना घडल्याने सर्पमित्रांना कार्ड देणे बंद केले. शहरात कोठेही साप अथवा वन्यजीव आढळल्यास नागरिकांनी १९२६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. वन विभागाकडून त्या वन्यजीवाला रेस्क्यू करण्यात येईल.-प्रदीप सुतार, वन्यजीव बचावकर्ता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -