‘वंशाला मुलगी नको, मुलगाच पाहिजे’ या बुरसटलेल्या विचारातून तंत्रज्ञानाचा गैरवापर होत असून, आजही राज्यात दररोज 150 मुलींची गर्भातच शिकार होत आहे. हे चित्र पुरोगामी राज्याला भूषणावह नाही, असे प्रतिपादन ’लेक लाडकी अभियाना’च्या प्रवर्तक ॲड.
वर्षा देशपांडे यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदराचे 836 पर्यंत घटलेले प्रमाण दुर्दैवी असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
विश्वपंढरी येथे सद्गुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टतर्फे आयोजित सोहळ्यात ॲड. देशपांडे यांना ’श्री माऊली आनंदी’ पुरस्कार आईसाहेब सांगवडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. स्मृतिचिन्ह, हस्तलिखित ज्ञानेश्वरी, शाल आणि 25 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
ॲड. देशपांडे म्हणाल्या, विठ्ठल-रखुमाईच्या सान्निध्यात मिळालेला हा पुरस्कार जबाबदारी वाढवणारा आहे. तरुणांनी अध्यात्म आणि सेवेचा वारसा जपल्यास ते व्यसनांपासून दूर राहतील. तसेच, समाजाने जात, धर्म आणि लिंगभेद टाळून हुंडाप्रथा व गर्भलिंग निदानसारख्या दुष्प्रवृत्तींविरुद्ध उभे राहावे. आनंदनाथ महाराज यांनी, समोरच्याला सुखी पाहणे हेच खरे अध्यात्म असल्याचे सांगत देशपांडे यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी राम सांगवडेकर उपस्थित होते. भावना सांगवडेकर यांनी प्रास्ताविक केले, तर निरंजन सांगवडेकर यांनी आभार मानले.




