इचलकरंजी/प्रतिनिधी –
मुलं ही देवाघरची फुलं असे संबोधले जाते. परंतु यळगुड (ता. हातकणंगले) येथील कु. प्रणाली साळुंखे हिचा सावत्र बापाने तर सोनाळी (ता. कागल) येथीली वरद पाटील या मुलाचा अंधश्रध्देपोटी बळी देण्यात आला. या दोन्ही घटना मानवतेला काळीमा फासणार्या असून निष्पाप जीवांचा बळी घेणार्या दोन्ही प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी. त्याचबरोबर गुन्हेगारांचे वकिलपत्र कोणीही घेऊ नये, अशा मागणीचे निवेदन माणुसकी फौंडेशनच्यावतीने पोलिस आणि वकिल यांना देण्यात आले आहे.
यळगुड येथील युवराज साळुंखे या सावत्र बापाने नऊ वर्षीय प्रणाली या मुलीला पंचगंगा नदीत ढकलून दिले. तर सोनाळी गावातील वरद पाटील या लहान मुलाचा अंधश्रद्धेतून वडिलांच्या मित्रानेच बळी घेतला. या दोन्ही घटनांनी मानवतेला काळीमा फासला आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, गुन्हेगारांचे वकीलपत्र कोणत्याही वकीलांनी घेऊ नये यासाठी माणुसकी फौंडेशनच्यावतीने अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, पोलिस उपअधिक्षक बी. बी. महामुनी, इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनिल कुलकर्णी यांना देण्यात आले. तसेच या दोन्ही प्रकरणाचा गतीने तपास करुन संशयितांना गजाआड केल्याबद्दल पोलिस दलाचे अभिनंदन करण्यात आले.
निवेदन देतान माणुसकी फौंडेशनचे अध्यक्ष रवि जावळे, संजना हेब्बाळकर, गोपाळ उरणे, आनंद इंगवले, चेतन चव्हाण, ओंकार सुतार, कृष्णा इंगळे, दिपक पाटील, प्रथमेश इंदुलकर, दयानंद हासंगी, ऋषिकेश सातपुते, संकेत कांबळे, सार्थक नेजे, मनीष कासार आदी उपस्थित होते.